" मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला,मोगरा फुलला, मोगरा फुलला." मला ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी नेहमीच भुरळ पाडतात.म्हणजे मन नावाच्या मागावर असंख्य भाव भावनांच्या , विचारांच्या द्वैत,अद्वैताच्या सुंदर रंगीत धाग्यांनी विणलेला कवितारुपी शेला जगदीश्वर विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. किती अद्भुत कल्पना, ती सामान्य माणसाला सुचणे शक्यच नाही, आपल्या बुद्धीपलीकडचे आहे, किंवा ज्ञानेश्वरांइतकी बौद्धिक, वैचारिक उंची गाठणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे. मानवाला देवाने मन आणि बुद्धी यांची अचाट देणगी बहाल केली आहे जी इतर कुठल्याही प्राण्यात आढळणार नाही, मानवी बुद्धीने मनाला साथ देत अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध लावला आहे, मानवी मनातील संकल्पनांचा वारु एकदा का जर कल्पनेच्या आणि विचारांच्या विश्वात दौडायला लागला की त्याला बुद्धीरुपी सारथी लाभतो आणि मग काय त्यातुन ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, तुकारामांचे अभंग, रामदासांचा दासबोध अशा एकाहुन एक सरस ज्ञानसंपदा त्या अजब रसायनातुन बाहेर पडते, एवढेच नव्हे तर आपल्या बुद्धीच्या आणि मनोबलाच्या शक्तीवर स्वराज्य उभारणारा शिवबापण तयार होतो, इतके अफाट सामर्थ्य या मन आणि बुद्धी या दोन देणग्यांच्या ठायी असत. मानवी मनामधे विचारांचा एवढा गुंता असतो की तो सोडवायला त्याला अख्खं आयुष्य अपुर पडते. एक गाठ उकलत नाही तोच दुसरी तयार होते, सोडवता सुटत नाही, कारण मनाचा वारु चौफेर धावत असतो, पण या वारुला जर बुद्धीचे सारथ्य लाभले तर लगाम घालता येतो, नाहितर, " बुद्धीविना मती गेली " अशी काहीशी अवस्था होते. म्हणुन यांना समांतर ठेवणे आवश्यक असते.मनातल्या विचारांना जर प्रत्यक्षात उतरावायचे एक असेल तर मन आणि बुद्धी यांची सांगड घालावीच लागते त्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही, आणि हे ज्याला उमगले त्याला त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणीही थांबवु शकत नाही. असे अगणित लोक असतील की ज्यांच्या मनात काहीतरी धेय्य असत पण ते प्रत्यक्ष सफल होत नाही कारण तिथे त्यांची बुद्धी त्यांना साथ देत नाही किंवा मनातील विचारच इतके नकारात्मक असतात की तिथे बुद्धीला चालनाच मिळत नाही.पर्यायाने नशीबाला दोष देण्यापलीकडे मनुष्य काहीच करत नाही.पण सकारात्मक विचार करुन जर त्याला बुद्धीची जोड दिली तर मनातील गुंता सुटायला वेळ लागत नाही.पण त्याकरता प्रयत्न, परीश्रम आवश्यक असतात. आपले मन नेहमी अस्थिर असत, एखाद्या गोष्टीवर लवकर एकाग्र होत नाही, सारखी सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची देवाणघेवाण चालु असते आणि मन प्रत्येक ठिकाणी शंकित असते.जिथे शंका आली तिथे नकारात्मक विचार वरचढ ठरतात, नकारात्मक विचार आणि शंका तुमच्या मनातील गुंता वाढवतात.साशंक आणि नकारात्मक मनाने घेतलाला निर्णय फारसा लाभदायक नसतो, पण शंका न घेता जर सकारात्मक विचारांना बुद्धीची चालना दिली तर त्यात एक ऊर्जा, नवचैतन्य निर्माण होतं आणि सृजनशील कार्य पार पडत.मनात होणारया सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या गुंत्यातुन सकारात्मक आणि बुद्धीला चालना देणारे विचार निवडता आले पाहिजे तरच मानसिक, शारीरिक, भावनिक, आंतरीक उत्कर्ष होतो. मनुष्य मनातील या गुंत्यात सतत अडकलेला असतो, मानवी मन खरच खुपच अनाकलनीय आहे, याचा खोलीचा अंदाज घेणे तर सर्वसामान्यांना अशक्यच आहे. बरं दुसरे अस की समाधान या मनाला अस नसतंच मुळी, सारख कशात ना कशात गुंतत असत, तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे, " तुका म्हणे उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असु द्यावे समाधान " असे किती लोक वागतात? फारच कमी कारण तेच. कुठल्याही गोष्टीत समाधान नाही आणि त्यामुळे नेहमी अस्थिर, अशांत असे विचार मनात असतात, याचा परिणाम म्हणजे मानसिक त्रास, चिडचिड, आत्मक्लेश, नैराश्य या गोष्टींचा पगडा मनावर लवकर बसतो आणि बुद्धी भ्रष्ट होऊन अविचारी मनाने मनुष्य निर्णय घेतो त्याचे परीणाम मनुष्याच्या उत्कर्षात होत नाही तर तो विचार त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. बहिणाबाईंनी या मनाला एका ढोराची उपमा दिली आहे, किती समर्पक आहे ती. त्या म्हणतात," मन वढाय वढाय उभ्या पिकांतल ढोर, किती हाकला हाकला फिरु येते पिकावर" खरच किती साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी मनाची अवस्था सांगितली आहे, ती समजुन घ्यायला त्यांना काही फारसा विचार नाही करावा लागला,त्यांच्या अवतीभवती घडणारया दैनंदिन घटनांमधुन त्यांनी आपल्या बोली भाषेत कितीतरी सकारात्मक विचार असलेल्या कविता लिहिल्या आहेत. फारसे शिक्षण नसतांना,सकारात्मक विचारांना बुद्धीची चालना देऊन बहिणाबाईंनी केवढे मोठे जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. मनाच्या गाभारयात जर डोकावून पहाता आले तर मानवी जीवनाला काय बहार येईल ते कसे सांगावे? हे ज्यांना कळले आहे, ज्यांचा त्या निर्गुणाशी रोज संवाद चालत असे त्यांनाच माहित. तुकाराम महाराज या मनाच्या भावसमाधीत असतांना त्यांच्या अभंगातुन खुप सुचकतेने सुचवुन गेले ते पुढिलप्रमाणे, " कमोदिनी काय जाणीतो परिमळ, भ्रमर सकल भोगितसे" तसेच मानवी मन म्हणजे ते कमळ ज्याचा त्या शरीराला पत्ताच नाही, त्या मानवी मनरुपी कमळलासुद्धा त्याच्या सुवासाची कल्पना नाही ,त्याचा उपभोग मात्र हे भ्रमररुपी विचारच घेऊन राहिले आहेत, जे फक्त आणि फक्त आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी उपयोगात आणत आहेत. पण यातील जर सुवास सगळीकडे पसरवुन वातावरण जर सुगंधित करायचे असेल तर त्या भ्रमररुपी सकारात्मक विचारांना बुद्धीचातुर्याने कामी लावले पाहिजे. मनाची अवस्था सांगतांना ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात कि सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा हा भावनिक,रंगीबेरंगी शेला या असंख्य धाग्यांच्या गुंत्यातुन विणुन तो त्या निर्गुणाला अर्पण केला, त्याहीपुढे जाऊन ते म्हणतात की मनाचा हा गुंता सोडविता सोडविता जे सकारात्मक विचार हाताशी आले त्यातुन एक ना अनेक प्रकारचे अनाकलनिय गुढ मला गवसले, नवचैतन्य निर्माण झाले,सृजनाची निर्मिती झाली, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत तयार झाला, एक विचार मांडत नाही तर लगेच दुसरा नवीन असलेला सकारात्मक विचार तयार व्हायचा, म्हणुन तर ते म्हणतात की," फुले वेचिता बहरु कळियासी आला,मोगरा फुलला, मोगरा फुलला. "अशा प्रकारे सकारात्मक विचाराने बुद्धीला चालना देऊन जर मनाचा गुंता सोडवता आला तर जग किती सुंदर असेल नाही? पण ते अवगत करणे वाटत तेवढे सोपे नाही. " ईये मनाचिये गुंती रंगोनी जाऊ रंगात, पाहण्या निर्गुण सगुण हरीरुप." 🙏🏻🙏🏻 सौ.माधवीजोशी माहुलकर. 🙏🏻🙏🏻( माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही. )🙏🏻🙏🏻#marathi #marathimovies #marathiatricle #marathisongs #oldhindisong